भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर येथे नऊ वर्षांपूर्वी सराफा व्यावसायिकासह पत्नी व मुलगा यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल देतांना भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश अस्मर यांना सर्व सात ही आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली . हत्याकांड्याच्या तब्बल नऊ वषार्नंतर या प्रकरणात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शहानवाज उर्फ बाबू सत्तार शेख (३२), महेश सुभाष आगासे (३५), सलीम नजीम खा पठाण (३४), राहुल गोपीचंद पडोळे (३२), मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसुफ शेख (३४), शेख रफिक शेख रहमान (४५) व केसरी मनोहर ढोले (३४) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत. २५ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथील प्रतिष्ठित सराफा व्यवसायिक संजय चिमणलाल रानपुरा (सोनी) (४७) त्यांची पत्नी पूनम संजय रानपुरा (४३) व त्यांचा मुलगा दुर्मिळ संजय रानपुरा (१२) याची यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर अवघ्या २४ तासात तुमसर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपीनी ८.३ किलो सोने चांदीचे दागिने व ३९ लक्ष रुपयांची रोख ही चोरून नेली होती. गळा आवळून खून केल्यानंतर लूटपाटीच्या घटनेला अंजाम देण्यात आला होता. तुमसर शहरातील रामकृष्ण नगर येथे राहणाºया संजय चिमणलाल सोनी (४७), पुनम संजय सोनी (४३), ध्रुमिलसंजय सोनी (११) ह्या एकाच कुटुंबातील तिघा लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संजय सोनी हे व्यवसायाने सराफा व्यावसायिक होते.
त्यामुळे बरेचदा ते सोन्या-चांदीची विक्री करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जात होते. घटनेच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१४ ला संजय सोनी यांनीएका चालकाला गोंदियाला जाण्यासाठी फोन केला. संजय सोनी हे गोंदियाला कशाला जातात याची कल्पना या चालकाला होती. त्यामुळे त्याने लगेच एक मोठे कारस्थान रचले. त्यानुसार त्याने नागपूर येथील सहा लोकांना यात सामील करून घेतले. संजय सोनी २६ फेब्रुवारीला चालकाला घेऊन आपल्या गाडीने गोंदियाला गेले. सर्व व्यवहार आटपून नेहमीप्रमाणे त्याच रात्री ते तुमसरला परत निघाले.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात आल्यानंतर बिरसी फाट्याजवळ चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबविली. ठरल्याप्रमाणे त्याचे तीन साथीदार हे त्याला तिथे भेटले. यांना तुमसरपर्यंत जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. गाडीत बसताच या तिघांनीही नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली. हत्यानंतर संजय यांचा मृतदेह घेऊन हे सर्वच लोक संजय यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी, संजय साहेबांना वाटेत भोवळ आल्याने या लोकांच्या मदतीने त्यांना घेऊन आलो असे सांगत चालकाने सर्व लोकांना घरात प्रवेश मिळवून दिला. घरात आल्यानंतर सर्वप्रथम यांनी संजय सोनी यांचा मुलगा ध्रूमिल याची गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर त्यांची पत्नी पूनम सोनी यांचीही गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिजोरीतील सर्व सोन्याचांदीचे दागिने आणि नगदी घेऊन पसार झाले. मात्र जाण्यापूर्वी हे तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून घरात दरोडा पडल्यानंतर या तिघांचीही हत्या झाली असा देखावा निर्माण केला होता.