भंडारा पत्रिका/वार्ताहर जांभोरा/करडी: खडकी ते मांडवी हा रस्ता अधिकारी आणि लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षित पणामुळे नादुरुस्त बनला आहे. रस्त्याने जाणे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे आहे. याकरिता गेल्या ६ दिवसा अगोदर माजी सरपंच थामदेव वणवे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आले. कनिस्ट अभियंता सा. बा. उपविभाग भंडारा यांनी ४-५ दिवसात रस्त्यांची डागडुजी केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. मात्र अधिकाºयांचे आश्वासन हवेतच विरल्याने पुन्हा मरणासन्न झालेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी पुन्हा आंदोलनाची तयारी जनतेने केली आहे. प्राप्त माहिती वरून प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १६ मांडवी ते ढिवरवाडा हा मार्ग भंडारा येथे जाण्यासाठी जवळ व सोयीचा असल्याने मोठ्या प्रमाणात या मार्गावर सतत वर्दळ असते.
परंतु याच मार्गाने अवैध वाहतुकीचे ट्रक ओहरलोड प्रमाणात आवागमन करत असल्याने रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. आजमितीला डोंगरदेव ते मांडवी हा रस्ताच दिसेनासा झाला आहे. सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. दुचाकी असो वा चारचाकी व इतर वाहन असो, जीव मुठीत घालूनच या मार्गाने प्रवास करावा लागतो. तेव्हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा म्हणून ढिवरवाढ्याचेसरपंच थांमदेव वणवे यांच्या नेतृत्वात परिसरातील जनतेनी ११ मे रोजी ढिवरवाडा येथे प्रशासनाला सूचना देवून रास्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा आंदोलनाची धग लक्षात घेता त्यावेळी कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा यांनी आंदोलन स्थळी येवून येत्या ४-५ दिवसांत रस्ता दुरुस्त करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. १३ दिवस लोटूनही सध्या कच्चा माल रस्ताच्या कडेला दिसून येत नाही, त्यामुळे जमत नाही तर आश्वासन देता कशाला अशी म्हणण्याची पाळी जनतेवर आली आहे. त्यामुळे शासनाप्रति जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.
मुकबधिर कोण?
शासन प्रशासन हा जनतेसाठी आहे. रस्ता हा जनतेसाठी आहे. त्यांची देखभाल दुरुस्ती ही शासन प्रशासनाची आहे. या मार्गाने शासन आणि प्रशासनातील घटक आवागमन करतात. पण सर्व मुंग गिळून गप्प आहेत. कारण शासन आणि प्रशासनातील अनेक मंडळी ही काचबंद गाड्यातून जात असल्याने त्यानांही खड्डे दिसेनासे झाली आहे. सामान्य जनता मात्र नाहक त्रास सहन करीत आहे. एकूणच मुकबाधिर कोण? असा प्रश्न उभा झाला आहे.
दिवाळीलाच रस्ते दुरुस्त का होतात
खडकी ते मांडवी हा रस्ता पूर्णत: नंदुरुस्त बनला आहे. असे जिल्ह्यात अनेक रस्ते नादुरुस्त आहेत. पण ते दुरुस्तीला सामोरे जात नाही. आंदोलन होऊनही थातुरमातुर आश्वासने देवून वेळ मारून नेला जातो. पण दिवाळीच्या हंगामात कुठलेही निवेदन नाही, आंदोलने नाहीत, मागणी नाही तरीही रस्ते दुरुस्तीचे वारे दिसून येतात, रस्त्यापासून ते झाडांना रंगाने सजविले जाते, हा प्रकार अनेक कालावधी पासून सुरू असून रस्त्यांची दिवाळी की संबंधितांची दिवाळी साजरी होते, अशातला हा भाग आहे. लवकरच पुन्हा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी थांमदेव वणवे व गावकरी तसेच इतर गावचे सरपंच आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.