भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता काही तासांवर आली आहे. बंगालच्या उपसागरात वाºयांची स्थिती मंदावली आहे. त्यामुळे विदर्भात मान्सूनचे मोसमी वारे सक्रीय होणार आहे. परिणामी विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात वा-यांचा वेग थंडावला आहे. त्यामुळे कोकण, मुंबई आणि ठाण्यातही पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा जोर कमी असेल त्यानंतर जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार येत्या २४ आणि २५ जून नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. वादळाची स्थिती ओसरल्यानंतर मोसमी वाºयांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात २३ जून पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर २४ आणि २५ जून नंतर पावसाचा जोर वाढत जाणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.