भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणरडे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांची भीती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरू असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाविकास आघाडीतून बिभीषण प्रवृत्ती गेली हे बरेच झाले, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अजित पवार यांना लगावला. काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नानापटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रपरिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाच्या सत्तापिपासू राजकारणावर आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रिपदे देतात. भह्यष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता व त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता? असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला.