भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गाव, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच धर्तीवर समाजकल्याण विभागाने याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील १२ गावे व ५८ वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली आहे. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ११ व अर्जूनी मोरगाव तालुक्यातील १ गावाचे तर उर्वरित सहा तालुक्यातील ५८ वस्त्यांची नावे जातीवाचक होती. राज्यातील अजूनही अनेक शहरांमध्ये, गावांना, वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब भूषणवह नाही. त्यामुळे ही नावे बदलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे ११ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता. यानंतर गोंदिया जिल्ह्यात याची पंचायत समिती व नगर परिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी केली. गोंदिया जिल्ह्यातील १२ गावे व ५८ वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली आहे. या गावे वस्त्यांना बुद्धनगर, दत्तात्रयनगर, जंबुदीपनगर, संत रविदासनगर, आदर्शनगर, जोतिबानगर, एकलव्य नगर अशी नावे दिली आहे. समाजकल्याण विभागातंर्गत उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली. जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात गोंदिया जिल्हा अग्रेसर राहिला आहे.