नारायण सीताराम फडके हे ना.सी.फडके नावाने अधिक परिचित होते. काँग्रेसच्या विचारप्रणालीवर ‘शोनान’, ‘तुफान’, ‘अस्मान’या आझाद हिंद चळवळीवरील कादंबºया त्यांनी लिहिल्या.नारायण सीताराम फडके यांचा जन्म दि.४ आॅगस्ट १८९४ रोजी अहमदनगरच्या कर्जतमध्ये झाला. तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे नामवंत प्राध्यापकअसलेल्या, मराठीप्रमाणे इंग्रजीतही लेखन करणाºया फडके यांनी अनेक कला व क्रीडा प्रकारांतही रस घेतला. वडिलांची फिरतीची सरकारी नोकरी असल्याने निफाड, बार्शी इत्यादी ठिकाणी प्राथमिक शिक्षण झाले. १९०४ मध्ये वडिलांची पुण्यात बदली झाल्यावर नूतन मराठी विद्यालयामधून शालांत परीक्षा (मॅट्रिक)व फर्ग्युसन महाविद्यालयात बीए व एमए केले. ते न्यू पुना कॉलेजात प्राध्यापक म्हणून १९१६ मध्ये दाखल झाले. त्यांचा पहिला विवाह १९२० मध्ये झाला. महात्मा गांधींच्या आवाहनानुसार त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी प्राध्यापकीचा त्याग केला. नंतर सेंट स्टीफन्स महाविद्यालय, दिल्ली, सिंध, हैदराबाद व नागपूर येथील महाविद्यालयांत काम केले. काही काळ सक्तीची बेकारी असल्याने अस्थिरता आली. मात्र,कोल्हापूरातील राजाराम महाविद्यालयात १९२६ मध्ये रूजू झाल्यानंतर स्थिरता आली.
१९५१ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. १९५१ पासून पुण्यात कायमचे स्थायिक झाले. अंजली वार्षिकाचे प्रकाशन व झंकार साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले. फडके यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा विचार करता, ते काहीसे स्वत:तच रंगलेले व स्थिर झालेले दिसतात. त्यात नंतर फारसा बदल झालेला दिसत नाही. जीवनाकडे, कलेकडे व साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्थिर नव्हे तर अधिकच दृढ झाला. त्यांच्यात व तत्कालीन महत्त्वाचे कादंबरीकार वि.स.खांडेकर यांच्यात प्रदीर्घकाळ चाललेल्या कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात त्यांनी कलेची एक बाजू सतत लावून धरली. त्यामुळे तत्कालीन भारतातील साहित्यावरचे साम्यवादी विचारसरणीचे सावट काहीसे दूर होऊन मराठी साहित्य व कलाप्रांतातील वातावरण मुक्त व मोकळे राहण्यास मदत झाली. कलेच्या स्वायत्ततेच्या कल्पनेच्या संदर्भात त्यांनी साहित्यात राजकीय व्यक्ती नकोत,हा आग्रहही धरला व कोल्हापूर येथे १९३२ मध्ये भरलेल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असल्याने त्यावर बहिष्कारही घातला.
आज साहित्यक्षेत्रावर राजकारण्यांची जी कुरघोडी दिसते,त्या पार्श्वभूमीवर फडके यांचा बाणेदारपणा उठून दिसतो. अशीच भूमिका संतती नियमनाच्या आचाराबाबत त्यांनी घेतली व तत्त्वासाठी नोकरीचा त्याग करून काही काळ सक्तीची बेकारी पत्करली. फडके यांनी सर्वच वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केले. कादंबरीमध्ये फडके-खांडेकर यांचे युग असा एक अर्थपूर्ण प्रयोग केला जातो. हरिभाऊंच्या पाल्हाळीक, काहीशा बोजड भाषेतल्या व शैलीतल्या मराठी कादंबरीला त्यांनी बांधेसूद, आधुनिक व तंत्रशुद्ध रूपदिले. विशेषत: बोलीभाषेला जवळची असणारी सुटसुटीत,सोपी भाषा दिली. त्यांच्या कादंबºयांचीच संख्या ७४ आहे. या कादंबºयांतून त्यांनी भारतातील सामाजिक,राजकीय चळवळी व घटना यांना स्थान दिले. गांधीप्रणित स्वातंत्र्याची चळवळ ते काश्मीर, हैदराबाद, सुभाषबाबू व सावरकर विचारप्रणाली या सर्वांवर त्यांनी प्रवासी, निरंजनया कादंबºया व काँग्रेसच्या विचारप्रणालीवर शोनान, तुफान, अस्मान या आझाद हिंद चळवळीवरील कादंबºया लिहिल्या.
साहित्याप्रमाणेच संगीत, क्रिकेट, चित्रकला, शिल्पकला इत्यादी ललित कलांचाही त्यांनी व्यासंग केला व मराठी वाचकांना वेळोवेळी पाश्चात्त्य साहित्यकृतींचा व अन्य कलांचा परिचय करून देऊन त्यांची अभिरुची समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.१९२५ मध्ये त्यांची कुलाब्याची दांडी ही पहिली कादंबरी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि १९७८ च्या दिवाळी अंकात त्यांची अखेरची ७४ वी कादंबरी हेमू भूपाली प्रकाशित झाली. १९२५ ते १९४४ हा पहिला कालखंड कादंबरीच्या विकासाचा होता. त्यात त्यांनी विषयाचे,रचनेचे अनेक प्रयोग केले. तत्कालीन कालखंडातील राजकीय व सामाजिक घडामोडी, यांबरोबरच त्यांनी मानसशास्त्रीय समस्यांचाही उपयोग केला. त्यातून त्यांचा उद्धार, इंद्रधनुष्य, खेळणी इत्यादी कादंबºयांचे लेखन झाले. त्यांनी आपल्या कादंबरी. तत्कालीन कादंबरीकार खांडेकर व माडखोलकर यांनाही लोकप्रियतेत मागे टाकले व आपल्या तंत्राचा व रचनाकौशल्याचा तत्कालीन कादंबरीवर प्रभाव टाकला. कादंबरी म्हणजे फडक्यांचीच असे एक समीकरण त्यांनी निर्माण केले. त्यांच्या कादंबरीच्या दुसºया कालखंडात(१९४४ ते १९७८)त्यांच्या कादंबरीचा केवळ विस्तार झाला. या कालखंडातही विषयाचे नावीन्य त्यांनी जपले.
फडक्यांच्या कादंबरी-लेखनात विषयाचे नावीन्य, तंत्राची विविधता, प्रयोग व भाषेतील उत्तरोत्तर वाढत गेलेली सफाई इत्यादी गुण असूनही तिचा या कालखंडात संख्यात्मक विस्तार झाला. मात्र,गुणात्मक विस्तार फारसा झाला नाही. फडके यांचे लेखन त्यांच्या पूर्वीच्या सर्व वैशिष्ट्यांसह अखेरपर्यंत चालू राहिले. फडके यांनी कथालेखनही विपुल प्रमाणात केले मेणाचा ठसा ही त्यांची पहिली कथा(१९१२). १९२५ ते १९४० हा त्यांचा बहराचा काळ. प्रतिभासाधन मध्ये त्यांनी लघुकथेचे मंत्र व तंत्र उलगडून दाखवले व त्यानुसार स्वत: कथालेखनही केले. प्रारंभी रत्नाकर, यशवंत व नंतर किर्लोस्कर वगैरे नियतकालिकांतून त्यांनी मराठी कथेचे पाल्हाळीक, संपूर्ण सचित्र गोष्टीचे स्वरूप बदलून तिला इंग्रजीतील पो, मोपांसा, ओ.हेन्री इत्यादी कथालेखकांच्या परिशीलनातून एक आधुनिक व रेखीव स्वरूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
कादंबरीप्रमाणेच तिची खेळकर, सुटसुटीत भाषा व शैली त्यांनी घडवली. आधुनिक मराठी लघुकथेचे श्रेय खांडेकरांपेक्षा फडक्यांनाच दिले पाहिजे, असे गंगाधर गाडगीळांनी म्हटले. मात्र हे श्रेय देत असतानाच वाचकांची खुशामत करण्याची व तिचे जीवनानुभव मर्यादित करण्याचे अपश्रेयही त्यांनाच दिले पाहिजे असेही नमूद केले. त्यांच्या सुरुवातीच्या माणूस जगतो कशासाठी? सारख्या काही कथा याला अपवाद आहेत.मराठीतील संपूर्ण सचित्र गोष्टीपासून आधुनिक लघुकथेपर्यंतच्या विकासाच्या प्रवासात फडके यांचा वाटा लक्षणीय आहे. लघुकथेबरोबरच लघुनिबंधाचा गुजगोष्टीहा वेगळा वाङ्मयप्रकार त्यांनी इंग्रजीतील रॉबर्ट लिंड, ई.व्ही.ल्यूकस, चेस्टरटन वगैरेंच्या लघुनिबंधांच्या धर्तीवर मराठीत आणला. त्याची पुढे खांडेकर, कणेकर ते ना.मा.संतांपर्यंत एक परंपरा निर्माण झाली. पुढे मात्र व्यक्तिदर्शनापेक्षा त्यात प्रदर्शन वाढल्याने तो प्रकार अस्तंगत झाला.
प्रतिभासाधन, प्रतिभाविलास, लघुकथालेखन मंत्र व तंत्र इ. समीक्षाग्रंथांतून त्यांचे समीक्षा-विचार व्यक्त झाला आहे.त्याचा प्रभाव समकालिनांवर व पुढच्या दोन पिढ्यांवर तरी पडला. मात्र त्यांची टीका प्रतिभासाधनाच्या वेळी बनलेल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या व आवडीनिवडीच्या वतुर्ळातच फिरत राहिली. त्यांनीअन्य वाङ्मयप्रकार हाताळले असले, तरी कादंबरीकार म्हणूनच त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली व यश लाभले. प्रा.कुसुमावती देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे प्रेमविषयक चिंतन उथळ व ठरावीक ठशाचे असले तरी त्यात खांडेकरांच्या चित्रणातील अवास्तवता व अतिरंजितपणा नाही किंवा माडखोलकरांची उग्र शारीरिकता नाही. त्यांच्या शैलीची सहजता व रुचिर सौंदर्यदृष्टी यांमुळे हे चित्रण विशेष आकर्षक होते. उद्बोधन आणि मनोरंजन ही दोन सूत्रे फडके-पूर्व साहित्यामागे होती, त्यात पहिल्यांदाच बदल करून तिला केवळ मनोरंजनाच्या वाटेने नेण्याचे व तिच्यावरील सर्व प्रकारची बंधने झुगारून देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य फडके यांनी केले व मराठी कादंबरीच्या विकासाचा मार्ग मोकळा केला.
मात्र त्यामुळे तंत्रवादालाच महत्त्व मिळाले व कलेसाठी कला नव्हे तर शेवटी कलेसाठी जीवनया भूमिकेत तिची परिणती झाली, हेही तेवढेच खरे. महाराष्ट्रातील गेल्या पन्नास वर्षांतील महत्त्वाच्या घटना, चळवळी व विचारप्रणाली यांचा त्यांनी आपल्या कादंबरीलेखनासाठी उपयोग केला. स्वत:ला काळाच्या मागे पडू दिले नाही. लघुनिबंध या वाङ्मय प्रकाराचे विलायती रोपटे त्यांनी जाणीवपूर्वक मराठीत रुजवले व वाढवले. एकीकडून हरीभाऊ आपटे व दुसरीकडून बा.सी.मर्ढेकर यांच्यामधील मोक्याच्या टप्प्यावर फडके उभे असून, त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.त्यांची तंत्रशुद्धता, आधुनिकता, अद्ययावतपणा, बांधेसूदपणा, विलोभनीय भाषा व शैली यांमुळे त्यांच्या नावाने मराठी साहित्यातील एक कालखंड नेहमीच ओळखला जाईल व हेच त्यांचे मराठी साहित्याला योगदान म्हणता येईल. त्यांना मिळालेल्या अनेक मानसन्मानांत रत्नागिरी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९४०), पद्मभूषण (१९६२) हे प्रमुख आहेत. २४ आॅक्टोबर १९७८रोजी त्यांचे निधन झाले.
पोलीस उपअधीक्षक व्हायचे स्वप्न… मोहाडी तालुक्यातील मूळचे सातोनाचे कु.प्रतिभा नत्थू बडवाईक असून वडिलांचे इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान असून आईचे माहेर मौदा तालुक्यातील आष्टी येथील मंदा लक्ष्मण वाडीभस्मे असून गृहिणी आहे. प्रतिभा हिने नानाजी जोशी विद्यालय शहापूर येथून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिभाने नंतर एमआयईटी,शहापूर येथून पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे प्रतिभाचे स्वप्न होते. २०१४ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर कॅम्पस सिलेक्शन आणि रेल्वे परीक्षेत यश मिळवूनही प्रतिभाने आपले लक्ष जाऊ दिले नाही. प्रतिभा २०१९ पासून टढरउ परीक्षेची तयारी करत आहे. प्रतिभा तिच्या पहिल्याच प्रयत्नात २०२० मध्ये टढरउ परीक्षेत बसली. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांनी उपलब्ध वेळेचा पुरेपूर वापर करत एमपीएससी तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पहिल्या निकालानंतर मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. या परीक्षेचा निकाल ४ जुलै २०२३ रोजी लागला,ज्यामध्ये प्रतिभाने गुणवत्ता संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. तिला पुढे पोलीस उपअधीक्षक व्हायचे आहे. कोणत्याही आलिशान सुविधांशिवाय ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या प्रतिभाने कठोर परिश्रमाने यश संपादन केले आहे,तिने आपल्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले आहे. सर्व स्तरातून या प्रतिभावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोहाडी तालुक्यातील १०८ गावातील तेली समाजातून सातोन्याची प्रतिभा बडवाईक हिने पहिली पोलीस उपनिरीक्षक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. हे विशेष.