भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील विकास कामांना निधी देण्यात येतो. गतवर्षीपेक्षा भंडारा जिल्ह्याला २०२५-२६ यावर्षासाठी भरीव निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील असे आश्वस्त उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काढले. आॅनलाईन बैठकीद्वारे भंडारा जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समितीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी पालकमंत्री संजय सावकारे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे आॅनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर कुर्तकोटी व सर्व विभाग प्रमुख सभागृह परिषद कक्षात उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले की, शासकीय इमारतीइमारतींचे विद्युतीकरण हे सौरऊर्जेद्वारे करण्यात यावे. या कामाला प्राधान्य देण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा सर्व शासकीय कार्यालय विभाग प्रमुख असतील यांनी सौर ऊर्जेवर विद्युतीकरण प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा. भंडारा जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी व तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील यंत्रणांनी या दृष्टीने विचार करून विकास आराखडा सादर करावा. जल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळा निधी देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी आॅनलाइन पद्धतीने नागपूर विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातून डॉ.माधवी खोडेचवरे उपस्थित होत्या.