भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे विजेच्या उपकरणांजवळ कचरा जाळल्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महावितरणने केले आहे. वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीला नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पयार्याने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचºयास आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. वीज यंत्रणाउन्हामुळे तापलेली असल्याने अशातच अशा आगीमुळे वीज वितरण यंत्रणेचे तापमान वाढल्यास यंत्रणेला त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचºयाचा ढिग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्यास १९१२ किंवा १९१२०,१८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.