भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अहो ! भुसे काका, कमी पटसंख्येमुळे आमचे शिक्षक कमी होणार असे कळले. वर्गाला शिक्षकच नसेल तर आम्ही शाळा सोडायची काय?, गावात शाळाच नसेल तर आम्ही कुठे शिकायचं?, शिक्षक कमी करून आमचे शिक्षण थांबवू नका. तुम्ही आमच्या हिताचा नक्कीच विचार कराल, असा विश्वास आहे, अशी भावनिक साद घालणारे पत्र जिल्हा परिषद शाळा अंबाडीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठविले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी शाळा बंद करून खेड्या-पाड्यातील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे दि. १५ मार्च रोजी निर्गमित झालेला संचमान्यतेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्रे पाठवून आमचे शिक्षक कमी करून शाळा बंद करू नका, गावातील शिक्षण वाचवा, शाळा टिकवा, विद्यार्थी घडू द्या अशी मागणी या पत्रातून केली आहे. भंडारा जिल्ह्यातील जवळपास १०० ते१५० जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे पत्र लिहून शिक्षणमंत्र्यांना शाळा आणि शिक्षण वाचविण्यासाठी हाक दिली.
भुसे काका, आमची शाळा वाचवा
